नरनाळा
अकोला शहरातुन नरनाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी आकोट मार्गे शहानूर गावात यावं लागतं.
शहानूर गावातुन गडमाथ्यावर जायला व्यवस्थित गाडी रस्ता आहे. छोट्या घाटाचा हा रस्ता पार करुन आपण शक्कर तलावापाशी येतो. अजुन एक मार्ग म्हणजे या गाडी रस्त्यानी शहानूर दरवाज्यापाशी यायच. हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार.
दरवाज्यावर काही कलाकुसर नसली तरी दरवाज्याची ऊंची, त्याबाजुचे बुरुज आणि आधीची तटबंदी यामुळे त्याची भव्यता कुठेच कमी पडत नाही. मेंढा दरवाज्यातुन पुढे गेलं की रायगडावरील महादरवाज्याला असलेल्या बुरुजांची आठवण करुन देणारे पण एकदम वेगळे असे दोन बुरुज आणि त्यामधे असलेला मेहंदी दरवाजा दिसतो. हा मेहंदी दरवाजा मागे ठेउन पुढे आलं की डोळ्याचं पारणं फिरणारं द्रृश्य आपल्याला दिसतं. हे म्हणजे या गडाचं केंद्रस्थान म्हणता येइल असा महाकाय महाकाली दरवाजा.
हा महाल समोर ठेउन उजवीकडे एक छान कलाकुसर असलेली मशीद बघायला मिळते. तर डावीकडे एक पायवाट जाते. या वाटेनी सरळ गेलो की एका चौथर्यावर कमानी दिसतात. याच्या खाली आहे ती तेला-तुपाची विहीर. इथुन पुढे गेलं की अजुन एक वाडा दिसतो ज्याला बाहेरील बाजुस चार कमानी आहेत. इथुन पुढे परत शक्कर तलावापशी आलं की तलावच्या पलिकडच्या काठावर वनकर्मचार्यांसाठी असलेली घरं दिसतात. साधारण ४ ते ५ कर्मचारी या गडावरील गस्ती्चं आणि वन्यप्राण्यांच्या रक्षणाच महत्वाचं काम करतात. या मजुरांच्या मदतीला एक हती देखील इथे पाळलेला आहे. या घरांच्या बाजुनी जाणार्या पायवाटेनी पुढे गेलं की एक रस्ता दिल्ली दरवाज्याकडे जातो. वाटेत एक मारुती मंदीर, राम तलाव, मोती तलाव लागतात. दिल्ली दरवाज्यामधे येण्याचा मुख्य रस्ता हा तिथे असलेल्या झाडाझुडुपांमुळे बंद झालेला आहे त्यामुळे गडावरुनच मागील बाजुनी आत शिरावं लागतं. आतमधे उंच कमानी आणि देवड्या आहेत. या प्रवेशद्वारावर दगडामधे कोरलेली कमळं दिसतात. इथुन पुढे जाणारा रस्ता नउगजी तोफेकडे जातो. एक गज म्हणजे अडीच फूट. यावरुन तोफेच्या लांबीचा अंदाज येतो.
या तोफेच्या वरील बाजुन फारसी किंवा उर्दु मधे कोरलेले शीलालेख बघायला मिळतात. तोफ ज्या दरीच्या दिशेनी रोखलेली आहे ते चंदन खोरं. हे चंदन खोरं आपल्या डाव्या हाताला ठेवत पायवाटेनी पुढे गेल्यावर बुरुजांनी बंदीस्त वाडा बघायला मिळतो. त्याच्याच समोर एक टेहाळणी बुरुज आहे. इथुन आपण पुढे परत शक्कर तलावापाशी येतो. गडाची ही पूर्ण फेरी करायला २ तासाचा अवधी पुरेसा आहे. सोबत वनकर्मचारी असल्यामुळे गड बघणे सोयीस्कर होते.
गाविलगड
अकोल्याहुन गाविलगडाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी चिखलदर्याला यायच.
या दरवाज्यातुन आत शिरल्यावर डावीकडे गज आणि सिंह अशी दोन शिल्प बघायला मिळतात. बहुतकरुन ही २ शिल्प या वीरभान दरवाज्यावरील असावीत. याच बरोबर डावीकडेच टेकाडावर बघितलं तर आपल्याला लोहारी तोफही द्रृष्टीक्षेपात पडते. दरवाज्यातुन पुढे एक रस्ता सरळ मोझरी दरवाज्याकडे जातो आणि दुसरा रस्ता खाली दिल्ली दरवाज्याकडे जातो. या खाली जाणार्या रस्त्यानी २० ते २५ मिनीटं चालुन गेल्यावर "शारदुल" दरवाज्यापाशी आपण पोचतो. दगडामधे मध्यभागी कोरलेलं खजुराचं झाड, त्याच्या बाजुला असलेली द्वीमुखी गरुडाची शिल्पं (ज्याला गंडभिरुंड असही म्हणतात), त्याच्या खाली व्याल आणि त्यांच्या पायात असलेले हती अश्या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी हे प्रवेशद्वार सजलेलं आहे.
हा शारदुल दरवाजा पार करुन पुढे गेल की अजुन एक छोटेखानी दरवाजा लागतो. आणि या दरवाज्याच्या पुढे आहे तो म्हणजे प्रशस्त असा दिल्ली दरवाजा.
गडाचं शत्रुपासुन संरक्षण करण्याच्या द्रुष्टीनी या तीनही दरवाज्यांचं अतिषय महत्व असणार यात काही शंका नाही. दिल्ली दरवाज्यातुन पुढे गेल्यावर डाव्या हातास खाम तलाव, देव तलाव, धोबी तलाव एकापाठोपाठ द्रृष्टीस पडतात. यापैकी देव तलावाला लागुनच सुंदर कलाकुसर असलेली एक मशीद बघायला मिळते. मशीदीच्या पुढे गेल्यावर एका छोट्या टेकाडावर आपण येउन पोचतो. इथे सुंदर कमानी असलेली एक वास्तु बघायला मिळते ज्याला धान्यकोठार असं म्हणतात. या धान्यकोठाराच्या उजव्या बाजुनी पुढे गेल्यावर एक वाट दाट(वडाच्या) झाडांमधुन वर जाते. इथे डाव्या हाताला एक भुयारी मार्ग आहे. याच्या आत एकतर न जाणे किंवा गेल्यास स्वतःच्या जबाबदारीवर जावे ही सुचना. हा भुयारी मार्ग मागे ठेवुन उजवीकडे वर एक पायवाट जाते जी आपल्याला किल्लेदाराच्या वाड्याकडे घेउन जाते. या वाड्याच्या समोर खाली दरीच्या दिशेनी पुढे गेल्यावर एक ढासळलेला बुरुज आणि त्याच्या आधी एक तोफ बघायला मिळते. याच किल्लेदाराच्या वाड्याच्या डाव्या हाताला एक पायवाट जाते ज्यानी काही अंतर पार केल्यावर आणखी एक तोफ आपल्याला बघायला मिळते. वर नमुद केलेल्या खाम तलाव, देव तलाव सोडल्यानंतर एक वाट डावीकडे जाते जी आपल्याला शंकराचं मंदीर आणि लोहारी तोफेकडे घेउन जाते. ही डावीकडील वाट सोडुन पुढे सरळ गेल्यावर धोबी तलावाच्या बाजुनी एक रस्ता सरळ जातो आणि एका भव्य मशीदीपाशी घेउन जातो. हा रस्ता माशीदीच्या मागील बाजुस येतो. ७ कमानी आणि ३ दालनं असलेली ही भव्य मशीद म्हणजे या किल्याचं एक प्रमुख आकर्षण म्हणता येइल.
प्रत्येक कमानीवरील कमळं, कमानीवरील सज्जा आणि त्यावर असलेले गोल घुमट फारच आकर्षक आहेत. या सभामंडपाच्या समोरील बाजुन भव्य पटांगण आहे आणि खालच्या बाजुस सुंदर कलाकुसर केलेलं मशीदीचं प्रवेशद्वार आहे. या मशीदीच सभामंडप आणि समोरील पटांगण बघता गाण्याची एकादी सुरेखशी मेहफील इथे करणं सहज शक्य आहे. या मशीदीच्या मुख्य प्रवेशद्वारतुन बाहेर पडल्यावर उजवीकडे जायचं आणि पुढे डावी पायवाट पकडायची जी आपल्याला काळभैरव तोफेकडे घेउन जाते. महाराष्ट्रातील गिरिदुर्गांवरील सगळ्यात जास्तं लांबीची अशी ही काळभैरव तोफ.
याची लांबी साधारण २३ फूट आहे. तोफेचं तोंड एवढं मोठं आहे की त्यात कुठल्याही आकाराच्या माणसाचं डोकं सहज जाऊ शकेल. तोफेच्या खालील बाजुस एक पायवाट जाते ज्यानी गेलं कि आपण पीरफत्ते दरवाज्यापाशी येतो. या प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे पण त्यातील मजकूर स्पष्ट दिसत नाही. या प्रवेशद्वाराचं मुळ बांधकाम हे काळ्या पाषाणामधे आहे पण प्रवेशद्वाराला लागुन एक दुमजली इमारत आहे. याचं बांधकाम मात्रं वीटांनी केलेलं आहे. मशीदीच्या मुख्य प्रवेशद्वा्रातुन बाहेर पडल्यावर उजवीकडे जायचं आणि परत उजवीकडे असलेली पायवाट (तोफेकडे जाण्यासाठी जिथे डावीकडे जातो तिथेच) पकडायची जी आपल्याला बहराम बुरुजाकडे घेउन जाते. तटबंदीलगत जाणार्या या वाटेनी गेलं की आधी २ मोठ्या तोफा पहायला मिळतात. यातील दरीच्या बाजुला असलेल्या तोफेच्या बाजुनी खाली गेल्यावर आपण बहराम बुरुजावर येतो. आजही याची तटबंदी पुर्णपणे शाबुत आहे आणि याच्या तटबंदीवर फारसी भाषेतला एक शिलालेख आहे. असा हा गाविलगड. माझ्याकडुन जितकी जास्त माहीती देता येइल तेवढी देण्याचा हा एक प्रयत्न. हा संपुर्ण किल्ला बघायला सधारण ५ ते ६ तास लागतात.